श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून शनिवारी प्रस्थान झाली.

अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून शनिवारी प्रस्थान झाली.*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे २७ वे वर्ष असून, दरम्यान या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे प.पू अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी, राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्या पत्नी निलम सामंत, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पदुकाच्या पूजनाने करण्यात आला.

सदरच्या पालखी पुजानंतर अन्नछात्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती, श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती, शिवाजी महाराज चौक (बस स्थानक) येथील श्री खंडोबा मंदिरातील आरती नंतर विजयबाग येथे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दर्शन घेतले. त्यानंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली. दिनांक २५ रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम असणार असून दिनांक २७ रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.